मोडकळीस आलेल्या मठात सुधारणा व्हाव्यात – डॉ.जयसिध्देश्वर मनुष्याची त्रिकरणशुध्दी हेच संस्कार – श्री मणिकंठ शिवाचार्य

सोलापूर ;- महाराष्ट्र स्पीड न्युज
दहिवडकर मठाच्या पुढील भागात काहींचे व्यवसाय आहेत. त्या मोडकळीस आलेल्या जागेत आणखी चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी जागेचे बांधकाम व विस्तारिकरण आवश्यक आहे. चांगल्या सोयीसह आणखी जागेची उपलब्धता करून इतरही व्यवसायीकांना जागा दिल्यास मठाचे उत्पन्न वाढणार आहे. यानंतर मी येईन तेंव्हा भूमीपूजनची तयारी दिसावी असे प्रतिपादन खा. डाॅ.जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी केले.
बार्शीतील दहिवडकर मठ येथे राष्ट्रीय निगमागम नीरजभास्कर ष.ब्र.१०८ गुरूसिध्द मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज यांच्या पट्टाभिषकाच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राचलिंग परंडकर, गुरूगंगाधर औंधकर, प्रभुदेव माढेकर, गुरूगिरी मानूरकर, मणिकंठ दहिवडकर आदी शिवाचार्य, ह.भ.प.परशूराम डोंबे, अशोक मठपती उपस्थित हाेते.
डाॅ.जयसिध्देश्वर म्हणाले, सोलापूर ते बार्शी येतांना खराब रस्त्यामुळे येण्यास उशीर लागला. मागील अनेक वर्षांपासून या ना त्या धर्मकार्यासाठी माझे बार्शीत येणे आहे, बार्शीतील बारा मठांची महती व धर्मकार्य चांगले आहे, आवश्यकतेनुसार दहिवडकर मठाच्या उत्पन्नाचा विचार करता आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे, मठाच्या कल्याणासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी दहिवडकर महाराज हे समाजात कोणापुढेही झोळी पसरतील आणि सुधारणेसाठी निधीचे संकलन करतील. तेथील व्यावसायिकांनी मठाच्या कार्यासाठी त्यांना साथ द्यावी अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य काशी महास्वामी यांनी मोबाईल व इंटरनेटच्या वापरातून भाविकांना संदेश दिला. यात दहिवड मठाच्या मणिकंठ शिवाचायार्यांनी उच्चस्तरीय धार्मिक ज्ञान ग्रहण केले आहे, अनेक राज्यांत त्यांचा वावर असून त्यांना विविध भाषांचे ज्ञान अवगत आहे. त्यामुळे त्यांनी विविध माध्यमांतून धर्मप्रचार व प्रसार केला आहे. समाजाला त्यांची उपयुक्तता असल्याने आणखी चांगले काम ते करतील असा विश्वास आहे.
मणिकंठ शिवाचार्य म्हणाले, संस्काररहित मनुष्य समाजामध्ये कहीही शांती, समाधान, सत्शीलवंत होवू शकत नाही. धार्मिक संस्कारानेच समाज सुधारतो, मनुष्याची त्रिकरणशुध्दी हेच संस्कार होय, समाजाच्या हितासाठी व धर्मरक्षणासाठी आवश्यकता भासल्याने नवीन पिढीच्या हितासाठी संस्कार शिबीराचे आयोजन केले होते, यासाठी पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.
याप्रसंगी उपस्थित शिवाचार्यांनी धर्मोपदेश व शिबीरार्थींना मार्गदर्शन केले. १५ दिवसीय धर्मसंस्कार शिबीरात ५० विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला. मार्कंडेय महाऋषींच्या जीवनचरित्रावरील लघुनाटीका, दिक्षा संस्कार, रूद्राभिषेक, बिल्वार्चन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. शैला कानडे, ऋतुजा कानडे, जितेंद्र स्वामी, अनिता नष्टे आदींनी मनोगते व्यक्त केली. वल्लभ मनगिरे, ओंकार स्वामी व शिवकन्या दळवे यांनी लघुनाटीका साठी परिश्रम घेतले. सहभागी शिबीरार्थींना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. महेश वाईकर यांनी सूत्रसंचलन केले