आरक्षण हे जाती-धर्मावर आधारित असून आर्थिक निकषावर द्यावे — ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांचे बार्शीत प्रतिपादन

सोलापूर;-
आजपर्यंत जेवढ्या संघटना सुप्रीम कोर्टात गेल्या त्या संघटना एक तर आरक्षण मागण्यासाठी किंवा एखाद्याचं आरक्षण रोखण्यासाठी गेल्या ; परंतु ब्राह्मण महासंघ ही अशी एकमेव संघटना आहे की आरक्षण हे जातीवर आधारीत नसून ते फक्त आर्थिक निकषावर देण्यात यावे अशी मागणी करीत समाजातील प्रत्येक जातीधर्मातील गरिबांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी काम करत असल्याचं प्रतिपादन ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी बार्शी येथे केले . ब्राह्मण महासंघाच्या बार्शी शाखेचा शुभारंभ व राज्यव्यापी ब्राह्मण महासंपर्क अभियानाची सुरुवात ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांचे हस्ते बार्शी येथील उपळाई रोड वरील छत्रपती शंभुराजे मंगल कार्यालय येथून करण्यात आली यावेळी ते बोलत होते . यावेळी बार्शी शाखेचे कार्यालय व हिंदुत्व मासिकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच बार्शी तालुका व जिल्हा स्तरावरील तसेच प्रदेश कार्यकारणी वरील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली .कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम व भगवंताच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली .
यावेळी ब्राह्मण महासंघाचे विश्वस्थ अॅड . विश्वास देशपांडे , राजू कुलकर्णी , मनोज तारे , प्रदेश संपर्कप्रमुख उमेश काशीकर यांचेसह प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष नमिता थिटे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पद्मजा टोळे यांचेसह सोलापूर , उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व समाज बांधव आणि भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . यावेळी बार्शीतून प्रदेश कार्यकारिणीवर प्रवीण शिरसीकर, ॲड.विजय कुलकर्णी व मीना धर्माधिकारी यांना घेण्यात आले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .शितल कुलकर्णी तर प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रवीण शिरसीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बार्शी शहराध्यक्ष प्रसाद सहस्त्रबुद्धे यांनी मानले . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूतन बार्शी तालुका अध्यक्ष अॅड . कैलास बडवे यांचेसह बार्शी शहर व तालुका पुरुष व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .